तानाजी मालुसरेंचा इतिहास-वारसा
तानाजी मालुसरेंचा इतिहास-वारसा ! छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापिले ते तानाजी मालुसरे, मुरार बाजी, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या नरवीरांच्या असीम शौर्याच्या बळावर. या रणवीरांच्या स्फूर्तीदायी कहाण्या आजही प्रत्येकाच्या अंगी वीरश्री चेतवितात. पण इतिहास लेखनामध्ये भावनिक अंगापेक्षा भर द्यावा लागतो सबळ पुराव्यांवर..शिवाजी महाराजांचे प्रमुख शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या ११ पिढीपर्यंतचा इतिहास, तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराजांनी अर्पण केलेली कवडय़ांची माळ, मालुसरे घराण्याला किल्लेदारी बहाल केलेल्या पारगडाशी संबंधित अस्सल पत्रे असे पुरावे आता समोर आले आहेत. मालुसरे घराण्याच्या इतिहासाचा नाममात्र उल्लेख सेतुमाधवराव पगडी, डॉ. कमल गोखले यांनी आपल्या लेखनात केला आहे. मात्र इतर इतिहासकारांनी मालुसरे घराण्याकडील ऐतिहासिक साधनांकडे अद्याप ढुंकूनही बघितलेले नाही ही आपल्याकडील इतिहास लेखनाची शोकांतिका आहे. या ऐतिहासिक साधनांची योग्य चिकित्सा करून शिवचरित्रात नवी व मोलाची भर घालणे आवश्यक बनले आहे.‘गड आला पण सिंह गेला’, ‘आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे’ अशी चमकदार वाक्ये त...